अनेक महान राजे या दक्खनेच्या भूभागावर होऊन गेले. सातवाहनांनी केवळ तीन समुद्राचे पाणी आपल्या घोड्यांना नाही पाजले, तर याच समुद्राच्या मदतीने दूरदेशी व्यापाराची देवाणघेवाण केली. परदेशात आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवला. वाकाटक सम्राटांनी या भूमीत शैव, वैष्णवाची बीजे रोवली.. अजिंठ्याच्या लेण्यांची निर्मिती केली. सातवाहन सम्राज्ञी नागणिका आणि वाकाटक सम्राज्ञी प्रभावतीगुप्त या दोन महिला शासकांनी या भूमीत आदर्श रुजवला. राष्ट्रकुटांच्या नेतृत्वाखाली सुवर्णकाळ अनुभवला. राष्ट्रकुट, कलचुरी सारखे शासक या भूमीत जन्माला आले. वेरूळच्या, घारापुरीच्या विश्वविख्यात सौंदर्याची निर्मिती झाली. शिलाहारांच्या काळात तर महाराष्ट्राच्या मंदिर स्थापत्याने कात टाकली. यादवांच्या कालखंडात भलीमोठी युद्धे या भूमीवर घडली. शैव, वैष्णव, शाक्त, महानुभावांचा मेळा या भूमीत साजरा झाला.
दुसरीकडे चालुक्यांच्या पुलकेशीने उत्तरेची दारे ठोठावली. दक्खन म्हणजे काय हे जगाला ओरडून सांगितले. कल्याणी चालुक्यांच्या काळात तर शिल्पकला आणि वास्तुकलेचा सौंदर्यविष्कार या भूमीला अनुभवायला मिळाला. याच दक्खनेत विजयनगरच्या साम्राज्याने इतिहासाला अचंबित केलं.. बहुदा दक्खनच्या वैभवाची मध्यान्ह याच काळाने अनुभवली.
पुढे आदिलशाही, कुत्बशाही, निजामशाहीच्या काळात झालेली राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उलथापालथ या भूमीने पचवली. इथल्या गवताच्या पात्यालाही तलवारीची धार देण्याचे काम मात्र डोंगरदऱ्यात राहणाऱ्या मराठ्यांनी केले. आणि अखेरीस एका युगपुरुषाचा जन्मही याच भूमीने साजरा केला. क्षत्रियकुळाचा शिरोमणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने या दक्खनेला प्रचंड सामर्थ्य असलेले.नेतृत्व लाभले. पुढे, राष्ट्राचा गाडा चालवण्याची जबाबदारी या दक्खनपुत्र मराठ्यांच्या खांद्यावर येऊन पडली आणि आजतागायत राष्ट्राचा गाडा हा दक्खनपुत्र हाकतोय..
गौतमीपुत्र सातकर्णी, रुद्रसेन, इम्माडी पुलकेशी, राजा सोमेश्वर, गंडरादित्य, सिंघणदेव, कृष्णदेवराय आणि युगनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज, महाबली शंभू छत्रपती, हिंदुस्थानाचे अधिपती थोरले शाहू छत्रपती..
हजारो वर्षांच्या वैभवशाली इतिहासाच्या प्रेरणेतून आम्ही 'दक्खन पब्लिशिंग हाऊस' सुरू करत आहोत. या प्रकाशन संस्थेमार्फत इतिहासाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, कला व स्थापत्यकीय अंगाचे यथायोग्य लिखाण प्रकाशित करण्याचा मानस आहे. सोबतच, साहित्यातील शक्य तेवढ्या प्रकारच्या कलाकृती या भाषेच्या समृद्धीसाठी प्रकाशित करण्याचा विचार आहे.
आजवर तुम्ही साथ दिली, प्रेम दिलं.. हे सारं काही दक्खन पब्लिशिंग हाऊस च्या प्रवासात कायम राहील, यात कसलेही दुमत नाही. अभिषेक कुंभार यांच्या फिरस्ते पुस्तकाच्या वेळी हा प्रयोग आम्ही याआधी करून पाहिला. पण त्यावेळेस काही कारणांमुळे, अनुभव नसल्यामुळे हे काम पुढे नेता आले नाही.
पण पुन्हा एकदा ह्याच जोमाने मैदानात उतरण्याचा विचार आहे. त्यामुळेच दक्खन पब्लिशिंग हाऊसचा घाट घातलाय. पहिलेच पुस्तक अभिषेक कुंभारांचे प्रकाशित होत आहे आणि तेही छत्रपतींच्या अपरिचित बसरूर स्वारीवर.. भविष्यात हा पसारा निश्चित वाढत जाईल.
कायम सोबत असणारे आणि जिथे चुकू तिथे कान पिळून योग्य वाटेवर आणणारे आमचे लाडके प्रकाशक, लेखक, उद्योजक आणि आमचे मोठे भाऊ शरद तांदळे सर यांच्या हस्ते आज औपचारिक पद्धतीने दक्खन पब्लिशिंग हाऊसचे लोकार्पण केले. शरद सरांच्या शुभेच्छा कायम पाठीशी असतातच, पण आज त्यांनी प्रेमाने दिलेले सल्ले पुढील वाटचालीसाठी पाठबळ देणारे आहेत.
संस्थेच्या लोगोमध्ये राजधानी साताऱ्याचा छत्रपतींच्या समाधीवर अंकित असलेला शरभ घेतलाय.. दक्खनच्या वैभवाचा, सामर्थ्याचा साक्षीदार.. दक्खनचे प्रतिबिंब..
वाचत राहू.. लिहित राहू.. आणि हो, प्रकाशन संस्था आपलीच आहे.
Dakkhan Publishing House is dedicated to bringing regional and global voices to life. Explore our curated selection of literature, research, and educational works.